अकरावी प्रवेशासाठी सीईटी : शिक्षण विभागातर्फे स्वतंत्र समितीची स्थापना

पुणे (विशेष प्रतिनिधी) – दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर 16 लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तिढा निर्माण झाला आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर अकरावी प्रवेशासाठी आता शालेय शिक्षण विभागातर्फे स्वतंत्र सीईटी परीक्षा घेतली जाणार असून, त्यासाठी शिक्षण तज्ज्ञांची स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती 15 जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांना अहवाल देणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने सुरवातीला दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणे शक्‍य आहे का, यासंदर्भात मुख्याध्यापकांचे अभिप्राय घेतले. त्यानुसार 21 हजार शाळांमधील मुख्याध्यापकांपैकी 17 हजार 487 मुख्याध्यापकांनी शक्‍य असल्याचे मत नोंदविले. दुसरीकडे, अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय योग्य राहील का, यासंदर्भातही राज्यातील दोन लाख दोन हजार 117 पालक-विद्यार्थ्यांनी “होय’ हा पर्याय निवडला. तर एक लाख आठ हजार 949 जणांनी नकार दर्शविला. सीईटी घ्यावी, असे म्हणणारेच सर्वाधिक असल्याने आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे.

तत्पूर्वी, दहावीचा निकाल जाहीर करण्याची कार्यपद्धती आणि अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षेचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र समिती नियुक्‍त केली जाणार असून, समितीत शिक्षण संचालकांसह विविध अभ्यासक्रमांचे संचालक आणि काही शिक्षण तज्ज्ञांचा समावेश असेल, अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

राज्यातील कोरोनाची स्थिती 15 मेनंतर सुधारेल, असा अंदाज होता. मात्र, अजूनही मुंबई, नाशिक, रायगड, नगर, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, बीड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या म्हणावी तितकी कमी झालेली नाही. दररोज सरासरी एक हजार रुग्ण कोरोनाचे बळी ठरत आहेत. दरम्यान, पावसाळ्यात मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, अमरावतीसह अन्य काही जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे कठीण होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर परीक्षा घ्यायच्या की रद्द करायच्या, यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या अन्य राज्यांतील शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करीत आहेत. परीक्षा रद्द झाल्यास या विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागेल. तूर्तास परीक्षेच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here