मुंबई (प्रतिनिधी) – अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ सोमवारी मध्यरात्री गुजरातच्या किनारपट्टीला धडकून आता शमले असून बंगालच्या उपसागरात मॉन्सूनची चाहूल लागते आहे. मोसमी वारे शुक्रवारपर्यंत (ता. 21) अंदमान बेटावर दाखल होत आहेत.यंदा पाऊसमान चांगले आहे, असा निर्वाळा अनेक मोड्युलनी दिला आहे. केरळात नियमित वेळेच्या एक दिवस आधी मोसमी वारे दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ सोमवारी मध्यरात्री गुजरातच्या किनारपट्टीला धडकले. त्याची तीव्रता ओसरू लागली आहे. ही वादळी प्रणाली राजस्थानकडे सरकत जाणार आहे.हे वादळ शमण्यास सुरुवात झाली असतानाच दक्षिण अंदमान समुद्रात मोसमी वारे दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. या भागात विषुववृत्ताकडून वाऱ्याचे प्रवाह येण्यास सुरुवात झाली आहे.
अंदमान-निकोबार बेटांवर १८ ते २० मे पर्यंत मोसमी वारे दाखल होत असतात. रविवारी बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती सुरू होत आहे. पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाताना ही प्रणाली तीव्र होणार आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांचे प्रवाह अधिक बळकट होणार आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता साउथ एशियन क्लायमेट आउटलूक फोरमने व्यक्त केली आहे.






