विवाहितेची आत्महत्या; संतप्त नातेवाइकांनी सासरच्या दारातच केले अंत्यसंस्कार

बारामती (प्रतिनिधी) – सांगवी येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतप्त नातेवाइकांनी विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार केले. दरम्यान, सांगवीत सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.

गीतांजली अभिषेक तावरे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती अभिषेक वसंत तावरे, सासू शारदा वसंत तावरे, सासरे वसंत केशवराव तावरे (रा. सांगवी) यांच्यासह नणंद सचिता सचिन काळभोर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) आणि वर्षा वाबळे (रा. पुणे) यांच्यावर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीतांजली व अभिषेक यांचा २४ मे २०२० मध्ये विवाह झाला होता. त्या वेळी लॉकडाउन असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सांगवीत विवाह पार पडला. विवाहापूर्वी झालेल्या बोलणीनुसार सात तोळे सोने, एक लाख रुपये हुंडा व दीड लाखाचे इतर साहित्य देण्यात आले.

लग्नात सोने कमी दिले म्हणून विवाहाच्या दिवशीच गीतांजलीला नणंद सचिताने अपमानित केले. दुसऱ्या दिवशी गीतांजलीने वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. वडिलांनी तिची समजूत काढली. त्यानंतरही वडिलांकडून ५० तोळे सोने आणण्याची मागणी करीत पती अभिषेककडून तिचा छळ करण्यात येत होता. यादरम्यान ती माहेरी गेली असता वडिलांनी गितांजलीची समजूत काढली आणि सासरी पाठवले. मात्र, सासरच्यांकडून सतत छळ करण्यात येत होता. २४ मे २०२१ रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी माहेरकडील मंडळींनी गीतांजलीला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. या वेळी तिने, ‘कसल्या शुभेच्छा देता, दोन नणंदा आल्या आहेत, आज माझा मरण दिवस आहे, नणंदा व पतीने मला मारहाण केली आहे,’ असे फोनवर रडतरडत सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी गीतांजलीने शेतात विषारी औषध प्यायल्याचे सासरच्यांनी तिच्या वडिलांना सांगितले. वडिलांसह नातेवाइकांनी तातडीने बारामतीला धाव घेतली. तिला उपचारासाठी पुण्याला ‘केईएम’ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान २७ मे रोजी गीतांजलीचा मृत्यू झाला. २८ मे रोजी माहेरकडील संतप्त मंडळींनी सासरच्या दारातच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यामुळे सांगवीत गेल्या दोन दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण आहे.

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींना अटक करण्यासाठी कारवाई सुरू असून, गावात शांतता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here