मुंबई – दैनिक ‘सकाळ’चे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे आज निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. कोरोनावर मात करून गेल्या आठवडय़ात ते घरी परतले होते. तीन आठवडय़ांपूर्वी त्यांच्या पत्नी क्षमा नार्वेकर यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात मुली, जावई असा परिवार आहे.
राधाकृष्ण नार्वेकर यांनी दैनिक ‘नवाकाळ’चे बातमीदार, दैनिक ‘सकाळ’चे संपादक, दैनिक ‘पुण्यनगरी’ वृत्तपत्र समूहाचे सल्लागार संपादक ही सर्व महत्त्वाची जबाबदारीची पदे भूषवली. नार्वेकर यांनी लिहिलेले ‘सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय?’ हे पुस्तक लोकप्रिय ठरले. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही लाभला होता.
त्यांचे ‘मनातली माणसं’ हे पुस्तकही गाजले. नार्वेकर यांनी आपली कोकणची बांधिलकी अखेरपर्यंत जपली. त्यांच्या पार्थिवावर मुलगी जयश्री, शिल्पा, जावई बिमल पारिख यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.






