ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – जिल्हयातील १० ते १२ जून २०२१ दरम्यान सोसाट्याचा वारा आणि अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे अचानक येणारा पूर किंवा भरतीच्या काळात अधिक पाऊस झाल्यास काही भाग जलमय होण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका संभवतो. तरी ग्रामस्थांनी अलर्ट राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जावू नये.अतिमहत्त्वाचे काम असल्याखेरीज कुणीही घराच्या बाहेर पडू नये. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तसेच समुद्र, खाडी, नदी किनारी धोकादायक भागात / पूर क्षेत्रात असल्यास तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबतघेवून स्थलांतरीत व्हावे. आपले घर दरड कोसळण्याच्या भागात असेल / तिव्र उतारावर असेल / सैल मातीच्या भागात असेल किंवा धोकादायक धरणाच्या खालील भागात असेल तर तात्काळ जवळच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. घराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे.आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. तसेच जनावरांना कुठल्याही पध्दतीने बांधून ठेवू नये.
आपले जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी दुरचित्रवाणी वरील बातम्या तसेच भ्रमणध्वनीवरील अधिकृत मेसेजेस आणि जिल्हा प्रशासनाकडून मिळणाऱ्या संदेश वेत. सोबत आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.पिण्याचे पाणी शुध्दीकरण करुन वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे. डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी मच्छर अगरबत्ती / मच्छरदाणीचा वापर करावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.






