२६ जुलैपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन : कोल्हापुरातून करणार सुरुवात
कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : शंभर वर्षांपूर्वी राजश्री शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिले पण एवढ्या वर्षानंतर ही सध्याच्या सरकारला ते देता येत नाही त्यामुळे मराठा आरक्षणासाठी येत्या 26 जुलै पासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून येणार असून त्याची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
यावेळी बोलतांना विनायक मेटे म्हणाले की, राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही. केवळ दोन दिवसाचे अधिवेशन हे तकलादू आहे. फक्त मराठा आरक्षण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तीन दिवसाचे अधिवेशन घेणे आवश्यक आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन पंतप्रधानांची भेट घेणे आवश्यक आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.
मराठा आरक्षणा संदर्भात या पवित्र स्थळांवर अनेक नेत्यांची भाषणे होतात. अनेक जण या आंदोलनस्थळी येऊन भाषण ठोकून गेले. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून कोणीच यशस्वी होत नाही. या व्यासपीठांवरून केवळ समाजाची दिशाभूल केली जाते, असे मत मेटे यांनी व्यक्त केले.






