घटस्फोटाच्या घोषणेनंतर २४ तासातच चाहत्यांशी साधला एकत्र संवाद
मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी शनिवारी संयुक्त निवेदन काढत दोघंही वेगळं होत असल्याची घोषणा केली आहे. आमिर आणि किरण राव यांनी १५ वर्षाच्या संसारात काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरणच्या या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला. या दोघांनीही पुढील आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे.
परंतु आमिर खान आणि किरण रावनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात दोघंही वैवाहिक नातं संपुष्टात आणत असले तरी व्यावसायिक नातं कायम राहील असं म्हटलं आहे. त्यानुसार, चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजक्टमध्ये आमिर आणि किरण एकत्रित काम करत असल्याचं स्पष्ट केले आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या घोषणेला २४ तास होत नाही तोवर आमिर खान आणि किरण राव यांनी एकत्रित येत फेसबुक लाईव्ह केले आहे. पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या ‘सोयाबीनची डिजिटल शेती शाळा’या उपक्रमात दोघांनीही हजेरी लावली होती.
Listen what Mr. Perfectionist and Kiran Rao said after getting divorced. #AamirKhan pic.twitter.com/5lXtwHIXo2
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) July 4, 2021
या फेसबुक लाईव्हमध्ये आमिर खान, किरण राव यांच्यासोबतच दिग्दर्शक सत्यजीत भटकळ, डीएल मोहिते, डॉ. आरएस जाधव, विलास शिंदे यांनी सहभाग घेतला होता. काही मराठी शेतकरीही या लाईव्हमध्ये सहभागी होते. सोयाबीनच्या शेतीबाबत असणारे प्रश्न या लाईव्हच्या माध्यमातून विचारण्यात आले. त्याला तज्ज्ञांनीही उत्तरं दिली. यावेळी आमिर खान आणि किरण राव यांनी विलास शिंदे यांच्या कामापासून खूप प्रेरित असल्याचं म्हटलं. या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमिरनं किरण रावसोबत व्यावसायिक संबंध कायम असल्याचं दाखवून दिलं आहे.






