महाड (प्रतिनिधी जयेश जाधव) : दरडग्रस्त भागाच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून नुकतीच त्यांनी भर पावसात महाडजवळील तळीये गावाची पाहणी केली. दरम्यान, त्यांनी दरडग्रस्त तळीये गावातील गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिले. ते म्हणाले की, गावातील लोकांनी काही काळजी करण्याचे कारण नाही. मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार असून गावातील दरडग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही. कालपासून सातारा, सांगली, कोल्हापूर भागात खूप तणाव होता. नद्यांचं पाणी शहरात शिरलं आहे, ते पाहता नद्यांच्या वाहत्या पाण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटचाही आराखडा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले. तेथील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला. तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.
तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले. pic.twitter.com/UP5pKO05x7
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 24, 2021
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वच ठिकाणी आपली पथकं पोहोचत आहेत. अनेक ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर केलं आहे, अद्यापही जिथं गरज आहे, तेथील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन पुरेशा प्रमाणात आणि तातडीने येत नाहीत, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना हे आरोप योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आपत्ती व्यवस्थापन करणारीही माणसंच आहेत, रस्ते खचलेत, पूर येतोय तेथे घटनास्थळी पोहोचायला त्यांनाही वेळ लागत आहे. पावसाची, वाहत्या पाण्याची अडचण आहे. मात्र, या टीम त्यांचं काम जोमानं करत आहेत, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.






