अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गणेश मूर्तीकारांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी – दिनकर कुंभार

सातारा (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) : जिल्ह्यातील उब्रंज जवळपास असलेल्या शिवडे गावातील गणपती मूर्तीकार अभिजीत कुंभार यांचे गणपती मूर्ती तयार करण्याचा कारखाना शेड पुणे बेगंलोर रोड लगत आहे. सातारा येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे दुर्दैवाने पाऊस जास्त झाल्यामुळे या गणपती मूर्ती तयार करण्याच्या कारखाना शेडमध्ये पावसाचे पाणी शिरले व रंगवलेल्या गणपती मूर्तींचे भरपुर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे कुंभार समाजातील अनेक मूर्तीकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोरानामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या त्रस्त झालेल्या या गणपती मूर्तीकारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.त्यात आता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानामुळे गणपती मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा हलाखीच्या परिस्थितीत जगायचं तरी कसं? असा प्रश्न कुंभार समाजातील गणपती मूर्तीकारांसमोर उपस्थित झाला आहे.

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था सातारा या संस्थेचे उपाध्यक्ष दिनकर आत्माराम कुंभार यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गणपती मूर्ती कारांच्या समस्येकडे त्वरीत लक्ष द्यावे व पंचनामे करून नुकसानग्रस्त गणपती मूर्तीकारांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी , अशी स्थानिक प्रशासनाकडे मागणी केली आहे.

या बाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येईल, असे अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे उपाध्यक्ष दिनकर आत्माराम कुंभार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here