कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : ‘मी शिल्पा शेट्टीच्या मातोश्री सुनंदा शेट्टी यांनी जमीन व्यवहार प्रकरणी फसवणूक केली नसून उलट त्यांनीच करारानुसार ४५ दिवसात होणारा व्यवहार अद्याप पूर्ण न करता उलट माझ्यावरच फसवणुकीची तक्रार केली आहे. तसेच त्यांनी प्रसार माध्यमात माझी नाहक बदनामी सुरू केली आहे. त्यामुळे मी सुनंदा शेट्टी यांच्यावर लवकरच अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.’ असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून स्पष्ट केले.
कर्जत तालुक्यातील एक शेतघरासह जमिन विकत घेण्याचा व्यवहार अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या आई सुनंदा शेट्टी यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याशी केला होता. हा व्यवहार मुदतीत पूर्ण न करता प्रत्येक वेळी तारीख पे तारीख देत तो आजपर्यंत लांबवत नेला आणि त्यांनी उलट घारे यांची तक्रार पोलीस ठाण्यात केली. याबाबत त्यामुळे प्रसार माध्यमातून घारे यांची बदनामी होत असल्याने घारे यांनी त्यांच्या आमराई मधील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष शरद लाड उपस्थित होते.
https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/529810091606223/
सुधाकर घारे यांनी याबाबत कागदपत्रे दाखवून पत्रकार परिषदेला सुरुवात केली. त्यांनी, ‘मध्यस्थांच्या मार्फत माझ्या मालकीची असलेली खरवंडी येथे असलेले सर्व्हे नंबर २९ हिस्सा नंबर २ क्षेत्र २८ गुंठे व सर्व्हे नंबर २७ हिस्सा नंबर ६ क्षेत्र २७ गुंठे जमीन व त्यामधील शेतघर सुनंदा शेट्टी यांना पसंत पडले त्यामुळे त्यांनी माझे शेतघर व शेत जमीनीचा व्यवहार करण्यासाठी त्यांच्याच वकिलामार्फत सर्च रिपोर्ट काढून स्वतःच्या नावे स्टॅम्प पेपर काढून सामंजस्य करार केला व हा व्यवहार ४५ दिवसात पूर्ण करण्याचे त्या करारात नमूद केले. त्यावेळी हा व्यवहार ३ कोटी ७५ लाख रुपयांना ठरला होता. त्यांनी त्यावेळी बायाणा म्हणून १ कोटी ६० लाख रुपये धनादेशाद्वारे मला दिले. मात्र त्यांनतर त्यांनी आज व्यवहार पूर्ण करू उद्या व्यवहार पूर्ण करू असे करीत करीत आजवर व्यवहार पूर्ण केला नाही. उलट मी त्यांच्याशी वारंवार संपर्क करून व्यवहार पूर्ण करण्याबाबत सूचित करीत असता त्यांनी माझा शेतकरी दाखला येण्यास उशीर लागेल, मी परदेशात आहे, सध्या मार्केटमध्ये पैसे नाहीत थोड सांभाळून घ्या, माझ्याकडे ब्लॅक मनी आहे तो चालेल काय? अनेक कारणे वॉट्सपच्या माध्यमातून दिली मी करारानुसार व्हाईट पैसे घेणार असल्याने ब्लॅक पैसे घेण्याचा प्रश्नच नव्हता त्यानंतर त्यांनी माझा मोबाईल नंबर ब्लॉक केला. त्यांनतर संपर्क होत नसल्याने नाईलाज म्हणून माध्यस्थाना त्यांच्या घरी पाठवून व्यवहाराचे कधी पूर्ण करणार हे विचारण्यासाठी पाठवले असता त्या मध्यस्थांना शेट्टींनी त्यांचे काहीही ऐकून न घेता घरातही घेतले नाही.’
‘त्यामुळे नाईलाज म्हणून मी माझे वकील अॅड. सी. बी. ओसवाल यांच्यामार्फत दोन नोटीस पाठवल्या त्या नोटीसींचे साधे उत्तरही अद्याप पर्यंत पाठवले नाही उलट चार – पाच महिन्यांपूर्वी त्यांनी माझ्या विरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मी सर्व कागदपत्र घेऊन पोलीस ठाण्यात गेलो व खरी वस्तुस्थिती कथन करून जबाबही नोंदविला. त्यावेळी जुहू पोलिसांनी ही बाब आमच्या अखत्यारीत नसून दिवाणी स्वरूपाची आहे असे सांगितले.
याबाबतचा खटला पनवेल न्यायालयात सुरू आहे. त्यानंतर आज सकाळी प्रसारमाध्यमांमध्ये ‘मी सुनंदा शेट्टी यांची फसवणूक केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्याने माझ्या बद्दलचे गैरसमज दूर होण्यासाठी तातडीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.’ असे स्पष्ट केल्या नंतर ‘सुनंदा शेट्टी यांनी माझीच फसवणूक केली आहे. या जमिनीचा सातबारा माझ्याच नावावर असून शेतघर सुद्धा माझ्याच नावावर आहे. व्यवहार करारानुसार पूर्ण केला नाही उलट जमीन व शेतघराची तीन वर्षे देखभाल केली त्याचा खर्च कोण देणार? मी आजही व्यवहार पूर्ण करण्यास तयार आहे. शेट्टी यांनी ठरल्यानुसार उर्वरित पैसे द्यावेत. मात्र प्रसार माध्यमांद्वारे माझी जी बदनामी सुरू केली आहे त्याबाबत लवकरच मी सुनंदा शेट्टी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.’ असे घारे यांनी स्पष्ट केले.






