नवी नियमावली जाहीर : या ११ जिल्ह्यांमध्ये राहणार निर्बंध कायम
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : आज (दि.२) दुपारी सांगली येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या कमी असणाऱ्या जिल्ह्यात दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्या असून, अनलॉकची नवी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयाने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या नव्या नियमावलीनुसार जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री आठवाजेपर्यंत सुरू असणार आहे. तर, रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानंच उघडी असणार आहेत.
अनलॉकच्या या नव्या नियमावलीकडे अवघ्या राज्याचं विशेष करून व्यापाऱ्याचं जास्त लक्ष लागलेलं होतं. यामुळे राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. कारण, ज्या भागात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तिथे हा दिलासा नसणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही देखील माहिती आज दुपारी दिली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी रूग्ण कमी होताय तिथल्या नागरिकांसाठी हा दिलासा असणार आहे. तर, पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असणार आहेत.






