कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कशेळे येथील स्पर्ध रिसॉर्टवर पर्यटनासाठी आलेले दोन पर्यटक चिल्हार नदीत वाहून गेले होते.काल दुसऱ्या दिवशी 24 तासांनी या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह चिल्हार नदीत सापडले असून तरुण विवाहित होता तर तरुणी अविवाहित होती. या रिसॉर्ट ला परवानगी नव्हती अशी बाब आता समोर येत असून कर्जत परिसरात असे अनेक रिसॉर्ट विनापरवाना हा गोरखधंदा चालवीत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याबाबत पोलीस प्रशासन का अनभिज्ञ आहे असा सवाल उपस्थित होत आहे.
शनिवारी कर्जत च्या कशेळे जवळ एका स्पर्श नावाच्या तथाकथित फार्म हाऊस वर एक दुर्दैवी अशी घटना घडली, मिळालेल्या माहिती नुसार पनवेल कळंबोली येथील बलवंत सिंग आणि मुंबई येथील निकिता माणगावकर हे दोघे येथे पर्यटनासाठी आले होते एकाच ठिकाणी हे दोघे काम करीत असल्याचे समजते, यातील तरुण विवाहित होता तर तरूणी अविवाहित होती, 20 ऑगस्ट रोजी त्यांचा कार ने ते दोघे कशेळे जवळील स्पर्श रिसॉर्ट मध्ये पर्यटनासाठी आले होते.तेथील रिसॉर्ट मध्ये मौजमजा केल्यानंतर ते दोघे 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता चेक आऊट करून रिसॉर्टच्या बाहेर पडले.

त्यानंतर पुन्हा दोन वाजता ते दोघे आपल्याला फार्म हाऊस बुक करायचे आहे आणि त्यासाठी साईट पहायची आहे असे सांगून पुन्हा एकदा रिसॉर्ट मध्ये पोहचले. त्यावेळी ते गाडी पार्क करून त्या फार्म हाऊस सोसायटी मध्ये फिरत होते.त्यानंतर सोसायटीच्या एका भागातून चिल्लार नदी वाहत असून काही वेळानंतर ते नदीच्या कडेला खडकावर बसून मद्यपान करीत होते. साधारण चार वाजता तेथील सुरक्षा रक्षकाला ते दोघे कुठे ही दिसत नसल्याचे लक्षात आले त्यामुळे दोन सुरक्षा रक्षक फार्म हाऊस सोसायटी मध्ये शोध घेत असताना चिल्लार नदीच्या कडेला खडकावर त्यांची बॅग आणि कपडे आढळून आले.त्यामुळे बलवंत सिंग कुलवंत सिंग आणि निकिता माणगावकर यांचा शोध सुरू झाला.मात्र ते नदीमध्ये वाहून गेले आहेत याबद्दल कोणालाही कोणतीही माहिती नव्हती. परंतु पाच वाजण्याच्या सुमारास सुगवे गाव येथे पुलावर काही गुराखी तरुण होते त्यांना एक तरुण नदीच्या पाण्यातून वाहून जाताना दिसला होता.त्या तरुणांनी त्या मृतदेहाचे आपल्या कडील मोबाईल वरून शूटिंग देखील केले. तेव्हा हे पक्के झाले की ते दिघे चिल्लार नदीत वाहून गेले आहेत तेव्हा पोलिसांना या बाबत खबर देण्यात आली.

सायंकाळी सात वाजता पोलीस त्या ठिकाणी पोहचले व शोध सुरू झाला परंतु काळोख पडल्याने कोणताही सुगावा लागला नव्हता. 22 ऑगस्ट रोजी कर्जत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने चिल्हार नदीमध्ये नालधे गावापासून पुढे सुगवे,गुडवण,आंथ्रट,पिंपळोली गावापर्यंत नदीच्या किनारी शोध कार्य सुरू केले.दुपारी अडीच वाजता सुगवे गावच्या हद्दीत 25 वर्षीय निकिता माणगावकर या तरुणीचा मृतदेह सापडला, तर त्याच काळात गुडवण आणि आंथ्रट या गावांच्या मध्ये चिल्हार नदीत बलवंत सिंग या तरुणाचा मृतदेह सापडला असून पोलीस निरीक्षक अरुण भोर तेथे उपस्थित होते.
कर्जत तालुक्यात नदीच्या पाण्यात वाहून जाणारे हे दोघे या वर्षातील सहावे बळी ठरले आहेत.या आधी पोश्री नदीत कळंब येथे दोघे, तर उल्हासनदीत दामत येथे दोघे नदीत वाहून गेले आहेत.तर पाली भूतीवली धरणात तिघांचा यावर्षी बुडून मृत्यू झाला आहे.कर्जत परिसरात शेकडो फार्म हाऊस आहेत त्यामुळे शनिवार, रविवारी या परिसरात हजारो पर्यटक मौजमजा करण्यास येत असतात. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा असताना कर्जत मध्ये अश्या घडणाऱ्या घटनानी तो ऐरणीवर आला आहे.

कशेळे येथे ही जी घटना घडली आहे त्याबद्दल भयानक माहिती समोर आली आहे. स्पर्श रिसॉर्ट हे ठिकाण कोणतेही परवानाधारक रिसॉर्ट नसून जवळपास 100 एकर जागेत वसलेले गृहसंकुल आहे. अनेक गुंतवणूकदारांनी येथे बंगले बांधले आहेत व अनेक बंगलेधारकांनी त्याच्या चाव्या येथे कोणाकडे तरी जमा केल्या आहेत व मौजमजा करायला येणाऱ्या पर्यटकांना हे बंगले भाड्याने दिले जात आहेत. असे अनेक फार्महाऊस या परिसरात असल्याचे समजते, मग या बाबत पोलीस प्रशासन अनभिज्ञ कसे असा सवाल आता विचारला जात असून कोणाच्या वरधहस्ताने हा गोरखधंदा सुरू आहे असा सवालही उपस्थित होत आहे.
या तथाकथित रिसॉर्ट मधून चिल्लार नदी वाहते मग नदीची तटबंदी का बंदीस्त केली नाही हा ही एक प्रश्न असून ती जर बंदिस्ती असती तर हे दोघे नदीपात्रात जाऊ शकले नसते व त्यांचा जीव गेला नसता. असो पोलीस तपासात काय निष्पन्न होते आहे ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






