कोकणात शिवसेना आमदाराची भाजप नेत्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : शिवसेना आणि भाजपा यांच्यातील राजकीय वाद विकोपाला जात असल्याचं चित्र आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर आता दोन्ही बाजूंकडून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनीही भाजप नेते आणि राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे समन्वयक प्रमोद जठार यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.

आमदार राजन साळवी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माजी आमदार प्रमोद जठार यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी केली आहे. नारायण राणे हे फौजदारी केसमध्ये संशयित आरोपी आहेत. त्यांची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करणे हे निंदनीय कृत्य आहे.

प्रमोद जठार यांनी २४ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले, असं वक्तव्य केलेलं आहे. नारायण राणे हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ठाकरे सरकार हे औरंगजेबाचे राज्य आहे, असा प्रमोद जठार यांच्या वक्तव्याचा हेतू आहे. अशा प्रकारे तुलना केल्याने तक्रारदार यांचे असंख्य अनुयायी व शिवसैनिक यांच्या भावना दुखावल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

जठार यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर असून यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचं राजन साळवी यांनी या तक्रारीत म्हटलं आहे. यामुळे प्रमोद जठार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही साळवी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here