एलसीबीने केली कंटेनरसह माल पळविणारी आंतराज्यीय टोळी जेरबंद

धुळे (प्रतिनिधी) : शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिस ठाणे हद्दीतून कंटेनर वाहनाचे अपहरण करुन त्यातील मालाची विक्री करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबद केले आहे. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 66 लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

रामदास हरदयाल पाल हे दि. 16 जुलै दरम्यान गौतम बुध्द नगर (उत्तर प्रदेश) येथुन एचआर 55 एल 9002 क्रमांकाच्या कंटेनरमध्ये इलेक्ट्रानिक्स वस्तु, वाहनांचे स्पेअर पार्टस व इतर वस्तु असा एकुण 75 लाख 7 हजार 950 रुपये किंमतीचा माल लोड करुन दिल्लीमार्ग औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे येत होते.

त्यांना दिल्लीच्या अगोदर रस्त्यामध्ये एक इसम भेटला. त्याने त्यांना त्यास धुळे येथे जायचे आहे, असे सांगुन वाहनात बसला. पुढे आल्यानंतर वाहनात बसलेल्या इसमाने चालकाशी गप्पा मारुन विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी शिवपुरी, मध्यप्रदेश येथे ढाब्यावर जेवण केले. जेवण करतांना ट्रक चालकास कोल्ट्रीक्स मधुन न कळत गुंगीकारक औषध देवुन ट्रक हा थाळनेर पोलीस ठाणे हद्दीतील गोल्डन रिफायनरी समोर आणुन तेथे वाहनाचा जीपीएस कट करुन वाहन नवापुरमार्गे नेवुन माल कोठेतरी उतरवुन घेतला.

त्यानंतर ट्रक व चालकास तलासरी (पालघर) येथे सोडुन दिले. चालकाची गुंगी उतरल्यानंतर त्याला आपली फसवणुक व मालाची चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्याने थाळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 379, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तो उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.

गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा तांत्रिक विश्लेषनाद्वारे समांतर तपास करीत असतांना हा गुन्हा हा (पलवल जि. पुन्हाना हरयाणा) येथील जमेशद खान दिनु खान व त्याचे साथीदाराने केला असल्याची शक्यता वाटल्याने संशयीताचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी व पथक यांना योग्य त्या सुचना देवुन पलवल, हरयाणा येथे रवाना केले. पथकाने पलवल येथे जावुन जमेशद खान दिनु खान व आब्बास युसुफ खान (रा.पलवल) ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हा गुन्हा इतर साथीदारासह केल्याची कबुली दिली.

गुन्हयातील मुद्देमाल हा सुरत येथील शशीकांत उपाध्याय व अरुणकुमार पांडे यांचेकडे ठेवला असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने हरियाणा येथुन ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपीसह सुरत येथे जावुन शशीकांत धरणीधर उपाध्याय व अरुणकुमार रमाशंकर पांडे (रा. सुरत) यांना ताब्यात घेतले. मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी चोरीस गेलेल्या मालापैकी एकुण 66 लाख 82 हजार 676 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोसई बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, पोहेकॉ संजय पाटील, संदीप पाटील, पोना कुणाल पानपाटील, संदीप सरग, रविकिरण राठोड, रविंद्र माळी, पोकॉ विशाल पाटील, सुनिल पाटील, मनोज महाजन, मनोज बागुल यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here