औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : प्रसिद्ध वन्य अभयारण्य असलेल्या गौताळा घाटात नागद ते कन्नड मार्गावर म्हसोबा हुडीजवळ पहिल्याच वळणावर दरड कोसळली आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी पहिल्या हुडीपासून ते दुसऱ्या वळणापर्यंत धोकादायक रस्ता झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठी दगडे वर अडकली आहेत. तसेच अनेक दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तर वनविभागाच्या कक्ष क्रमांक ५४८ ते ५४९ दरम्यान दरड कोसळली आहे, असे वनविभागाच्या अधिकऱ्यांनी सांगितले आहे.
दरड कोसळलेल्या गौताळा घाटातील रस्त्यावरून इंदौर, सुरत, नंदुरबार, धुळे, मालेगावकडे वाहने जातात. सिल्लोड व कन्नडकडे जाणारी-येणारी वाहने या गौताळा घाटात दरड कोसळल्याने बंद केली आहेत. या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे.
मागील आठवड्यात औट्रम घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामध्ये अनेक छोटी-मोठी वाहने अडकून पडली होती. तसेच अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये जीवितहानी देखील झाली होती. तसेच शेकडो वाहने व वाहनधारक या घाटामध्ये उपाशीपोटी राहिले होते. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीने भेट देऊन अडकून पडलेल्या वाहनधारकाची जेवणाची पाण्याची सोय करून तसेच अडकलेली वाहन रस्ता मोकळा करून वाहने पास करून घेतली होती. मात्र तेव्हापासून हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.






