औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाने एमपीएससी परीक्षेत आलेल्या अपयश आल्याची खंत आईला बोलून दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणाने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण मित्र मैत्रिणींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुसाइड नोट जप्त केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
किशोर भटू जाधव हा मागील ६ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याने धुळे येथे राहून दोन वर्षे तर मागील चार वर्षांपासून औरंगाबाद येथे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. दरम्यान नुकत्याच एमपीएससी परिक्षेच्या निकालात अपयश आल्याने तो खचला होता. याबाबत त्याने आपल्या आईला फोन करून नाराजी व्यक्त केली. आईनेही अजून प्रयत्न कर, नाहीतर घरी परत ये, असा धीर दिला.
किशोरचे वडील भटू हरी जाधव हे वाघाडी खुर्द ग्रुप ग्राम पंचायतीचे माजी सरपंच आहेत. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असून त्यांना एकूण तीन मुलं आहेत. सर्वात मोठा मुलगा विकास हा पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे. तर धाकटा मुलगा नागपूर खंडपीठात लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
किशोर हा दुसरा मुलगा होता. त्याला स्पर्धा परीक्षा देऊन मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न तो पहात होता. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेत यश मिळवून त्याला अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली होती. पण क्लास वन ऑफिसर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगल्याने त्याने ही नोकरी स्वीकारली नव्हती. त्यावेळी संबंधित परीक्षेत तो २६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. तसेच किशोरने पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा देखील उत्तीर्ण झाला होता. पण उंची कमी पडल्याने त्याला संधी मिळाली नाही.
यातूनच त्याने गुरुवारी सकाळी आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्येपूर्वी कोऱ्या कागदावर लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने काही मित्र मैत्रिणींचा उल्लेख केला आहे. संबंधित मित्र मैत्रिणीसोबत असलेल्या आर्थिक व्यवहारातून आणि मानसिक त्रासातून आत्महत्या करत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.






