मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : शिवसेना नेते रामदास कदम हे काही दिवसांपुर्वी त्यांच्या एका कथित ऑडिओ क्लिपवरून चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पण आता एका मुद्द्यावरून रामदास कदम हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी आता एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेना सोडणाऱ्यांच्या १५ जणांच्या यादीत पहिलं नाव रामदास कदम यांचं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट निलेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच आम्ही शिवसेना सोडताना कदमही शिवसेना सोडणार होते, असं म्हणत निलेश राणे यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.
‘आमच्या तेव्हाच्या शासकीय बंगल्यावरून रामदास कदम निघाले आणि त्यांनी खेडची परिस्थिती पाहून येतो कार्यकर्त्यांशी बोलून मग बाॅम्ब टाकू, असं म्हटलं होतं, पण रस्त्यात महाडजवळ त्यांना मातोश्रीवरून फोन आला की विरोधी पक्ष नेते पद मिळेल, तेव्हा त्यांनी गाडी वळवून मातोश्री गाठलं आणि पदाचा स्विकार केला’, असा राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारा खुलासा निलेश राणे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे किंवा शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्याकडून अजिबात अपेक्षा ठेवू नये, असं म्हणत रामदास कदम हे कुणाचीही शपथ खाऊन खोटं बोलू शकतात, असा आरोप राणेंनी केला आहे. पुढे बोलताना रामदास कदम यांनी कायम पक्षाच्या विरोधात काम केलं आणि विरोधी पक्ष नेता असताना सर्व सेटलमेंटची कामं केली, असा गंभीर आरोपही रामदास कदम यांच्यावर करण्यात आला आहे.






