बांधकाम व्यावसायिकाकडून १० लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : बदलापूर येथील बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या परिवाराला ठार मारण्याची धमकी देत, त्याला मारहाण करुन त्याच्याकडून दहा लाख ८९ हजारांची खंडणी उकळणाऱ्या कल्पेश जाधव (२६) आणि दीपक संदनशिव (३३, रा.दोघेही बदलापूर) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली. त्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

बदलापूर पूर्व भागातील प्रकाशकुमार जयस्वाल (३८) या बांधकाम व्यावसायिकाला २६ जून २०१९ ते १८ ऑक्टोंबर २०२१ या काळात बदलापूरातील मच्छी मार्केट जवळील पे अ‍ॅन्ड पार्क परिसरात तसेच इतरत्र हा प्रकार सुरु होता. कल्पेश, दीपक तसेच त्यांच्या इतर आणखी तीन ते चार साथीदारांनी आपसात संगनमत करुन जयस्वाल यांना रस्त्यात अडवून त्यांना तसेच त्यांच्या परिवाराला ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करीत त्यांच्याकडून काही रोकड, सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा दहा लाख ८९ हजारांचा ऐवज जबरीने काढून घेतला.

ही कैफियत जयस्वाल यांनी ठाणे गुन्वेषण विभागाकडे मांडल्यानंतर याप्रकरणी २ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात खंडणी उकळणे, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. याची गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी हे प्रकरण खंडणी विरोधी पथकाकडे सोपविले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे आणि सुधाकर हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. नाळे यांच्या पथकाने ३ नोव्हेंबर रोजी कल्पेश आणि दीपक या दोघांना बदलापूरातून अटक केली. त्यांच्या इतरही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here