औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : शहरातील न्यायनगरात शनिवारी संध्याकाळी सात वाजता हॉटेलमध्ये कूक काम करणाऱ्या अमोलराजे चव्हाण या तरुणाने प्रियसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला हा सगळा प्रकार खुनासारखा वाटला. त्या अनुषंगानं पोलिसांनी तपास करायला देखील सुरुवात केली. मात्र, मृताच्या शवविच्छेदनानंतर आत्महत्या असल्याचे स्पष्ट झालं. पोलिसांनी या तरुणानं आत्महत्या का केली असेल? याचा उलगडा करायला सुरुवात केली. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.
अमोलराजे भाऊसाहेब चव्हाण (वय ३२, रा. विष्णूनगर, लॉटरी गल्ली, जवाहर कॉलनी) येथे वास्तव्यास होता. तो सूतगिरणी चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये कूक म्हणून कामाला होता. घरामध्ये तो एकटाच कमावणारा होता. त्याचे वडील आजाराने अंथरुणाला खिळून होते. त्याची एक बहीण आई धुणीभांडी करून उपजीविका करायचे. ज्यामुळं तो एका हॉटेलमध्ये खूप म्हणून कामाला लागला. त्याच हॉटेलमध्ये संगीता (नाव बदललेले आहे) नावाची महिला काम करायची. ती न्यायनगरात राहते. ही महिला दहा वर्षांपूर्वी पतीपासून विभक्त झालीय. तिला १२ वर्षांची मुलगी आणि १४ वर्षांचा मुलगा आहे. एकाच हॉटेलमध्ये काम करत असल्याने अमोलची आणि महिलेची ओळख झाली. हळूहळू ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झालं. दरम्यानच्या काळात अमोलचे या महिलेच्या घरी जाणं- येणं वाढलं. कालांतरानं संगितानं ही अमोलराजेला सोबत राहण्यासाठी हट्ट करू लागली. आई वडिलांना सोडून तू माझ्यासोबत राहा असा सारखा तगादा लावायला तिने सुरुवात केली पण घरी अमोल राजे एकटाच कमावणारा होता. ज्यामुळं त्यानं तिला नकार दिला.
यामुळं संगिता अमोलराजेसोबत सतत वाद घालू लागली. शनिवारी दुपारी ३ वाजता अमोलराजे चव्हाण हा संगिता हिच्या न्यायनगरातील घरी गेला. त्यावेळी संगिता घरात नव्हती. तिचा मुलगा एकटाच घरी होता. ती मुलीला सोबत घेऊन कामाला गेली होती. अमोलराजेनं मुलाला घराबाहेर जाण्यास सांगितलं. त्यानंतर अमोलराजेनं आतून कडी लावून घेऊन गळफास घेतला. संध्याकाळी सात वाजता संगिता घरी आली. दरवाजा उघडला नाही म्हणून ती दरवाजाच्या फटीतून आत डोकावली. तेव्हा तिला अमोलराजे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर तिने शेजाऱ्यांची मदत घेऊन दरवाजा तोडला. दोन महिलांच्या मदतीनं रिक्षातून अमोलराजे याला घाटीत नेलं. तेथे स्ट्रेचरवरच डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. त्यानंतर तिघीही रिक्षातून पसार झाल्या. पुंडलिकनगर पोलिसांनी सीसीटीव्हीत आलेली रिक्षा शोधून महिलांचा शोध घेतला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात आत्महत्येचा प्रकार स्पष्ट झाल्यानं या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणाचा औरंगाबाद पोलीस तपास करत आहेत.






