चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी) – अनुसूचित जमातीचे हक्क व अधिकारांपासून वंचित असलेल्या एक कोटी जमातीवरील घटनाबाह्य अन्याय दूर करण्यात यावा अशी भूमिका आदिवासी कोळी महादेव संघाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षा सौ. सुनीता अडबोल यांनी घेतली असून यासाठी भद्रावती येथील तहसीलदार महेश शितोळे यांच्यामार्फत शासनाला एक निवेदन देण्यात आले आहे.
दिनांक 6 जुलै 2017 ला सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या 22 प्रकरणांबाबत दिलेल्या निकालानुसार अनुसूचित जमातींना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवू नये. त्याचप्रमाणे राज्यात आदिवासी समाजावर अनेक क्षेत्रातून अन्याय होताना दिसत आहे. तो दूर करण्यात यावा आणि समाजामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असे शासनस्तरावर प्रयत्न करावे अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यासाठी निवेदनातून अन्यायाची अनेक उदाहरणे देण्यात आली आहे .आदिवासींवरील अन्याय त्वरित दूर करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सुनिता अडबोल यांनी यावेळी दिला. यावेळी सुरेश अडबोल, प्रकाश कोठेकर, विनायक देशमुख, रामदास बोबडे, दामू मराठे ,रवींद्र वाघमारे, नानाजी वरखडे आदींची उपस्थिती होती.







