एरंडोल (प्रतिनिधी वाल्मिक सोनवणे) : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून सर्व जातीधर्मांना समान न्याय दिला म्हणूनच या देशातील एकात्मता अबाधित आहे. मात्र १० डिसेंबरला परभणी येथे सोपान पवार या माथेफिरु व्यक्तीने भारतीय संविधान प्रतिकृतीची तोडफोड व विटंबना केली आहे. तसेच परभणी येथील आंबेडकरी वस्त्यांमध्ये कोम्बिग ऑपरेशनमध्ये निरपराध तरुणांना उचलून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. याबद्दल वंचित बहुजन आघाडीतर्फे मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले असून, या प्रकरणाचा निषेध केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान मारहाण करुन त्याला आरोपी बनविले. मारहाणीनंतर पोलिसांनी त्याला दवाखान्यातही नेले नाही. यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूस पोलीस व्यवस्था जबाबदार आहे ही गंभीर बाब आहे.
आंबेडकरी समाज आणि चळवळ चिरडून टाकण्यासाठी शासनो पोलिसांनी फ्री हॅण्ड दिला असल्याचा आरोप करत निवेदनात म्हटले आहे की, सरकार आणि पोलिसांवर आमचा तसूभरही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ न्यायालयीन चौकशी करून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. निर्दोष लोकांवरील खटले मागे घेण्यात यावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश तामखरे, दीपक सोनवणे, वाल्मिक साळुंके, शांताराम साळुंके, भारत अहिरे, काशिनाथ काकडे, साहेबराव पानपाटील, सर्जेराव खैरनार, राजेंद्र सोनवणे, प्रकाश पवार, आत्माराम पवार, अमोल बोरसे, नरेंद्र तायडे, उमेश सूर्यवंशी. लक्ष्ममण नेतकर, चिंतामण जाधव, बाबूराव भगत, मनोज सोनवणे, हर्षल गोलाईत, सिध्दांत तायडे, पंकज ब्रह्मे, सागर सरदार, साहेबराव सपकाळे, सौ.संगीता खैरनार या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







