जालना (प्रतिनिधी) – चोर समजून जमावाने तिघांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (३० डिसेंबर) सायंकाळी जालना जिल्ह्यात घडली आहे. जालन्यामधील गुळखंड तांडा येथे ही घटना झाली आहे. भांडी घासायची पावडर विकण्यासाठी आलेल्या तिघांना जमावाने लाठी, काठ्या आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
परतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी इंदर कुमार साह हा तरुण त्याच्या दोन साथीदारांसह भांडी घासायची पावडर विकण्यासाठी गुळखंड तांडा येथे आला होता. जमावातील दोघांनी हे चोर आहेत असे म्हणत लोकांची गर्दी जमवली. पुढे गर्दीतील लोकांनी लोखंडी पाईप, काठ्या, लाकडी दांड्यांनी तिघांना अमानुषपणे मारहाण केली. मारहाणीमध्ये तिघेही गंभीर जखमी झाले.
मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी जमावातील ४५ लोकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तपास सुरु असून दोषींवर लवकरच कारवाई होईल असे परतूर पोलिसांनी म्हटले आहे. याशिवाय जखमी झालेल्या तिघांवर उपचार सुरु असल्याचेही म्हटले जात आहे.







