डेहराडून (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली. यानंतर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, “हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी या कायद्यासाठी रात्रंदिवस अगदी समन्वयाने काम केले. मुख्य सेवक सदन येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री धामी म्हणाले, आजचा दिवस केवळ आपल्या राज्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आम्ही समानता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या यूसीसीची अंमलबजावणी करत आहोत.
धामी पुढे म्हणाले, उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू करून, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह संविधान सभेतील सर्व सदस्यांना भावांजली अर्पण करतो. यूसीसीच्या अंमलबजावणीमुळे उत्तराखंडमधील सर्व नागरिकांचे हक्क आता समान झाले आहेत. सर्व धर्माच्या महिलांसाठी एकच संपूर्ण कायदा असेल. आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे.” एवढेच नाही तर, “या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे हलाला, इद्दत, बहुपत्नीत्व आणि तिहेरी तलाकवर पूर्णपणे बंद होईल.
मुख्यमंत्री म्हणाले, ” समान नागरिक संहिता कुठल्याही धर्म अथवा पंथाच्या विरोधात नाही. यात कुणालाही टार्गेट करण्यचे काहीही कारण नाही. या समाजात समानता आणण्याचा कायदेशीर प्रयत्न आहे. यात कुठलीही प्रथा बदलण्यात आलेली नाही, उलटपक्षी कुप्रथा संपवण्यात आल्या आहेत.”







