बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत नांदुरा तालुक्यातील लाभार्थ्यांचे पाच ते सहा महिन्यांपासून पैसे त्यांच्या खात्यांमध्ये जमा झालेले नाहीत. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना दररोज चकरा माराव्या लागत असून, त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या विषयाबाबत आज नांदुरा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व नेते, शिवसेना तालुकाप्रमुख ईश्वर पांडव, पंचायत समिती सदस्य प्रसाद पाटील आणि तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.







