मनमाड पोलिसांनी कारागृहातून सुटलेल्या चोरांकडून एक कोटीचे सोने केले हस्तगत

मनमाड

नाशिक (उपसंपादक संतोष रायचदे) : जिल्ह्यातील मनमाड येथील डमरे कॉलनीत सुमारे सव्वा किलो सोन्याच्या दागिन्यांसह आठ लाखांची रोकड चोरून धाडसी घरफोडी करणाऱ्या तीन सराइतांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि मनमाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी पाच लाख ४० हजार रुपये किंमतीचे एक हजार ५५ ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले. कारागृहातून सुटणाऱ्या सराइतांची तपासणी मोहीम पोलिसांनी सुरू केली असून, हा गुन्हा उघडकीस आणण्यात या मोहिमेची मदत झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. संजय किशोर गायकवाड (वय ३५) आणि राकेश अशोक संसारे (वय ३०, दोघे रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड) आणि राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या (वय ३०, रा. मदिना चौक, सारडा सर्कल, मारुती मंदिरामागे, नाशिक, मूळ रा. सुलतानपूर चौक, संजुनगर, गोरखपूर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तिन्ही संशयित सराईत गुन्हेगार आहेत.
अॅल्युमिनीयमचा व्यापारी असणारे मनमाड येथील मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या डमरे कॉलनीतील घरात ११ जून रोजी धाडसी घरफोडी झाली. रस्सीवाला कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराच्या खिडकीचे गज कापून व वाकवून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून एक हजार २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच आठ लाखांची रोकड असा सुमारे १ कोटी २८ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी रस्सीवाला यांनी घरफोडीची फिर्याद दिली होती. पोलिसांनी संशयितांना मनमाड आणि चांदवड परिसरातून ताब्यात घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here