मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकरप्रसाद यादव ऊर्फ कल्ली या कुख्यात गुंडावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून किंवा वैयक्तिक दुश्मनीतून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हल्लेखोरांनी शंकरवर अत्यंत क्रूरपणे तब्बल २९ वेळा धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमी शंकरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरावर खोलवर झालेल्या जखमा आणि झालेल्या अतिरक्तस्रावामुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंकरचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे भांडुप परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.







